Asia Cup Trophy Ind vs Pak Final: भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करत नऊव्यांदा किताब पटकावला. पाकिस्तानी संघ 20 षटकांत 146 धावांत गारद झाला. त्यानंतर विद्यमान विजेता भारताने 5 गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना तिलक वर्माने हरिस रौफच्या चेंडूला मिडविकेट स्टँडमध्ये षटकार मारला आणि त्यानंतर रिंकू सिंगने चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. तसेच अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीच्या हस्ते आशिया चषक स्पर्धेतील ट्रॉफी आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास देखील भारतीय संघातील खेळाडूंनी नकार दिला. त्यामुळं आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरु झाला. तेवढा वेळ मोहसीन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते. यानंतर मोहसीन नक्वी आशिया चषक स्पर्धेतील ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंनी वैयक्तिक पदकं घेऊन हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केले.
ट्रॉफीबाबत आयसीसीचे नियम काय?
ट्रॉफी स्वीकारण्यास कर्णधाराने नकार देणे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु त्याबाबत कोणताही विशिष्ट नियम नाही. हे क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा संस्था (ACC) किंवा ICC याबाबत निर्णय घेईल. सदर घटनेप्रकरणी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहेत का आणि जर तसे असेल तर उल्लंघनांसाठी कोण जबाबदार होते आणि कोणते दंड आकारले जाऊ शकतात, याबाबत आयसीसीकडून तपास केला जाऊ शकतो.
टीम इंडियाचा ट्रॉफीवर अधिकार
भारतीय संघाचा आशिया कप 2025 च्या ट्रॉफीवर पूर्णपणे अधिकार आहे. भारतीय संघाने या ट्रॉफीसाठी कठोर परिश्रम केले आणि सर्व प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले. जर भारतीय खेळाडूंना मोहसीन नक्वीशी हस्तांदोलन करायचे नसेल किंवा त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायची नसेल आणि असे करण्यास मनाई करणारे कोणतेही नियम नाहीत, तर त्यात काहीही गैर नाही. पण एखाद्या संघाने नुकताच जिंकलेला ट्रॉफीचा अधिकार हिरावून घेणे आणि तो सोबत घेऊन जाणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.
Asia Cup Trophy , ICC, BCCI, Ind vs Pak Final

Masta match hoti