दहा कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीसह ६० नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण; भूपतीनं का केलं महाराष्ट्रात आत्मसमर्पण ?

गडचिरोलीमध्ये नक्षल चळवळीत सक्रिय राहिलेला तथा वरिष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने अखेर आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. भूपतीवर विविध राज्यात मिळून तब्बल दहा कोटींहून अधिक बक्षीस होतं. दरम्यान, भूपतीसह ६० नक्षलवाद्यांनी १५ पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. गडचिरोलीतून नक्षलवाद जवळपास संपलाय.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“गेल्या जवळपास ४० वर्षांपासून सातत्याने नक्षलवादाशी लढणारा गडचिरोली जिल्हा, सुरुवातीच्या काळात चंद्रपूर, भंडारा, गोंदीया हा भाग देखील नक्षलवादाने ग्रस्त होता. त्यामध्ये विषेशतः गडचिरोली जिल्हा हा सीमावर्ती भाग आहे. हा सर्व भाग मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला. ज्यावेळी कोडापल्ली सितारामय्याने पीपल्स वार ग्रुप तयार केला, त्यानंतर तेव्हाचा आंध्र प्रदेश आणि गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात मावोवादी सक्रिय झाले आणि येथील युवकांमध्ये व्यवस्थेच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्यात आला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“भारतीय संविधानाने आपल्याला न्याय मिळवू शकत नाही, असा संभ्रम तेव्हा येथील युवकांमध्ये निर्माण केला गेला, तसेच जंगलातून आपण राज्य चालवून एक नवी व्यवस्था उभी करू अशा प्रकारचं स्वप्न त्यावेळी तरुणांना दाखवलं गेलं. त्यावेळी अनेक तरुण या स्वप्नाला बळी पडले, त्यांना वाटलं की त्या व्यवस्थेतून समता येईल. मात्र, खरी समता फक्त संविधानाने येऊ शकते. त्या काळात अनेक तरुण माओवादी चळवळीकडे ओळले. मात्र, त्यानंतर त्यांच्या सर्व स्वप्नांचा खरा चेहरा समोर आला. आज सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण आपण घेतलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

नक्षलवादी भूपतीनं का केलं महाराष्ट्रात आत्मसमर्पण ?

भूपती हा मूळ तेलंगणातील पेद्दापल्लीचा आहे. तो अर्थशास्त्रात पदवीधर आहे. याचा मोठा भाऊ किशनजी हा देखील मोठा नक्षलवादी नेता होता. 2011 साली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या चकमकीत तो ठार झाला. किशनजीच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळ अधिक आक्रमक करणारा भूपती हा केवळ लष्करी कमांडर नव्हता, तर त्याला संघटनेचा ‘मेंदू’ आणि ‘वैचारिक प्रमुख’ मानलं जाते. 1980 च्या दशकात त्यानं रॅडिकल स्टुडंट्स युनियनमधून नक्षल्यांच्या पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश केला. सीपीआय (एमएल) पीपल्स वॉरच्या स्थापनेत त्याची प्रमुख भूमिका होती. आंध्र प्रदेशातील ईस्ट गोदावरी, विशाखापट्टणम जिल्ह्यांमध्ये चळवळ रुजवून 1987 मध्ये त्यानं बस्तरच्या जंगलात ‘लिट्टे’च्या माजी सैनिकांकडून विशेष लष्करी प्रशिक्षण घेतलं. पुढं महाराष्ट्रातील गडचिरोलीत नक्षल चळवळीचा पाया घालण्यात आणि दंडकारण्य क्षेत्राचं नेतृत्व करण्यात त्याचा मोठा वाटा होता. 2004 मध्ये सीपीआय (माओवादी) पक्षाच्या निर्मितीनंतर त्याला पक्षाच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या पॉलीट ब्युरो आणि केंद्रीय लष्करी कमांडचं प्रमुखपद देण्यात आलं. तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ तो या पदावर कार्यरत होता. 2010 मध्ये प्रवक्ता आझाद याच्या मृत्यूनंतर त्यानं ‘अभय’ या नावानं संघटनेचा मुख्य प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील प्लाटूनचे मार्गदर्शक म्हणून काम करताना अनेक मोठ्या नक्षलवादी हल्ल्याचा सूत्रधार राहिला आहे.

तारक्कावर प्रेम ते लग्नगाठ
नव्वदच्या दशकात त्यानं गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील रहिवासी असलेली सहकारी महिला नक्षलवादी तारक्का हिच्यासोबत भूपतीनं लग्नगाठ बांधली. तारक्कानं आजारपणाचं कारण देत यावर्षी एक जानेवारीला आत्मसमर्पण केलं. 62 वर्षीय तारक्का दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य, तसेच दंडकारण्य विभागाच्या मेडिकल टीमची इंचार्ज होती. 38 वर्षांच्या नक्षल चळवळीतील कारकिर्दीत तिची प्रचंड दहशत होती. 8 नोव्हेंबर 2010 रोजी लाहेरी-मलमपोडूर गावांदरम्यान झालेल्या, 17 पोलीस हुतात्मा झालेल्या चकमकीचं नेतृत्व तिनं केलं. त्याचा व्हिडिओही तिनेच व्हायरल केला होता. 13 सप्टेंबर रोजी वहिनी सुजाता हिनं देखील आजारपणाचं कारण देत मुख्य प्रवाह निवडला. चळवळीत असतानाच सुजातानं 1984 साली किशनजीसोबत लग्न केलं. किशनजीच्या मृत्यूनंतर ती अधिक सक्रिय झाली.

वर्षभरापूर्वी पत्नी तारक्कानं केलं आत्मसमर्पण

गेल्या काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पणाचा क्रम सुरू आहे. याच वर्षी जानेवारीत भूपतीची पत्नी आणि वरिष्ठ महिला नक्षल नेत्या विमला सिडाम उर्फ तारक्का हिनंही शरणागती पत्करली. शिवाय भूपतीची वहिनी केंद्रीय समिती सदस्य तथा महिला नक्षल नेत्या पोथुला पद्मावती उर्फ सुजाता हिनं तेलंगणा इथं शरणागती पत्करली. 2022 मध्ये तीला केंद्रीय समितीवर स्थान मिळालं. पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांच्या आत्मसमर्पणानंतर भूपतीवर दबाव वाढला होता. सोबतच सुरक्षा दलाच्या आक्रमक कारवायांमुळे नक्षल चळवळ खिळखिळी झाली. यातूनच त्यानं केंद्र सरकारला सशस्त्र संघर्ष तात्पुरता थांबवून शांततेसाठी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आणि अनेक वर्षांच्या सशस्त्र संघर्षाला त्यांनी सर्वात मोठी चूक मानलं. त्याच्या या भूमिकेमुळे नक्षल संघटनेत मोठे वैचारिक मतभेद निर्माण झाले. अखेरीस त्यानं शस्त्र सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे दंडकारण्याच्या जंगलातील भूपती नावाच्या रहस्याचा, दहशतीचा आणि रक्तरंजित अध्यायाचा शेवट झाला आहे.

#DevendraFadnavis #DevaBhau #Gadchiroli #NaxalFreeMaharashtra

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments