लातूर : शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या दरम्यान झालेली आघाडी अभेद्य असून या पुढेही ती अभेद्य राहील असा विश्वास लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी व्यक्त केला आहे.
लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या पुढाकारातून ही आघाडी स्थापन झालेली आहे.लातूर महानगरपालिका निवडणुकीत या आघाडीला भरघोस असे यशही मिळाले आहे. त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगला संदेश गेला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या या एकूण प्रक्रियेत आणि नंतरही काँग्रेस पक्षाने नेहमीच वंचित बहुजन आघाडीसोबतच्या आघाडीचा सन्मान आणि आदर राखला आहे. त्यामुळे आगामी काळातही वंचित बहुजन आघाडीच्या, तसेच काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयमी भूमिका घ्यावी काँग्रेस – वंचित बहुजन आघाडीच्या मजबुतीला धक्का बसेल अशी विधाने करू.नयेत असे आवाहनही ॲड किरण जाधव यांनी या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे काम करून लातूर शहराच्या विकास प्रक्रियेला गती देतील, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची लातूर मधील सकारात्मक विचारातून निर्माण झालेली आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही ॲड किरण जाधव यांनी व्यक्त केला आहे.
